अकोले , ता . २५,प्रतिनिधी
जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन केल्यानंतर कळसुबाई हरिश्चंद्र गड अभयारण्याचे सहायक वन संरक्षक अधिकारी गणेश रणदिवे यांनी हा उपक्रम राबविण्याचे नियोजन केले. याकरिता त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पाचनई, कुमशेत , पेंडशेत ,शिरपुंजे ,पेठ्याची वाडी , रतनवाडी , तळे, कोथळे, फोफसंडी, साम्रद, कोलटेंभे, पांजरे , उडदवणे वन परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह योजनाबद्धरित्या लोकसहभाग केंद्रस्थानी ठेऊन हा कार्यक्रम राबविला.
त्याकरिता स्थानिकांच्या मदतीने भौगोलिक परिस्थितीची माहिती, क्षेत्रभेट आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सर्वांच्या सोयीनुसार बंधारे बांधण्याची वेळ निश्चित करण्यात आली. त्यामुळे स्थानिकांचा सहभाग वाढला.
नगर जिल्ह्यात पश्चिम घाटाच्या रांगा असून पावसाचे पाणी डोंगर उतारावरून छोट्या-मोठ्या ओहळ्यांमधून थेट समुद्रात वाहून जाते. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर काही काळाने ओहळ कोरडे पडतात. यापैकी काही ओहळांवर मातीचे बंधारे बांधण्याचे निश्चित केले. नैसर्गिकरित्या तयार झालेल्या आणि पाणी असलेल्या ओहळावर रिकाम्या पोत्यांमध्ये पाण्याच्या प्रवाहासह आलेली माती भरण्यात आली.
आपसूकच गाळ उपसला जाऊन खोलीकरणही झाले. या उपक्रमात वन कर्मचाऱ्यांसह त्या-त्या भागातील महिला-पुरुष, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शासकीय विभागातील कर्मचारी यांनी श्रमदानात भाग घेतला होता. सध्या मार्चमध्य सुरू असून या बंधाऱ्यातील पाण्याचा लाभ त्या परिसरातील नागरिक, वन्य प्राणी आणि वृक्ष-वेलींना होत आहे.
वनराई बंधाऱ्यातून काय साध्य झाले?
परिसरात पाण्याची पातळी वाढली. विहिरी, कूपनलिकाद्वारे पाणी उपलब्ध होऊन पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवणार नाही. गुरा-ढोरांप्रमाणेच रब्बी हंगामातील शेतीलाही लाभ झाला. जिल्ह्यातील पश्चिम घाटाच्या जंगलात बिबट्या, तरस, भेकर, रानडुकर, मोर आणि विविध वन्यजीव, पशू-पक्षी तसेच साप आहेत. उन्हाळ्यात त्यांची परवड थांबेल, हिरवाईमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे.
* गणेश रणदिवे सहायक वन संरक्षक वन परिक्षेत्र अधिकारी :
जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केल्यानंतर या विभागाअंतर्गत १० वनपरिक्षेत्रात लोकसहभागाला महत्त्व देऊन श्रमदानातून १०० वनराई बंधारे बांधण्यात आले.आमचे उद्धिष्ट २०० बंधारे आहेत त्याचा फायदा वन्यजीव आणि नागरिकांना होत आहे.तर जंगलात फायर लाईन टाकण्यात येत असून जंगलाला वणवा लागू नये याची दक्षता आम्ही घेत आहोत –
डी . डी . पडवळ (वन परिक्षेत्र अधिकारी )कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील पाचनई ( पेठेची वाडी ) येथे वन्यजीव विभागाने ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रमदानातुन हा बंधारा बांधला आहे याचे पाणी साधारण मे पर्यंत राहील अशा प्रकारचे १००च्या आसपास लहाण मोठे बंधारे वन्यजीव विभागाने राजुर व भंडारदरा येथे स्थानिकांच्या सहकार्याने श्रमदानातुन बांधले आहेत.
हेही वाचा :केंद्र सरकारच्या शेती कायद्यामुळे तालुक्यातील शेतकरी खुश

