ahilyanagar Maharashtra Right to Public Services

ताज्या बातम्या

शासकीय विभागानी नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा द्याव्यात – सेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी

By admin

July 16, 2026

अहिल्यानगर, दि. १६ :

ahilyanagar Maharashtra Right to Public Services महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना विहित कालमर्यादेत, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक विभागाने उत्तरदायित्व स्वीकारून काम करणे आवश्यक आहे. प्रत्येक तालुक्याने समन्वयाने आणि एकजुटीने काम करून जिल्ह्याची कामगिरी अधिक उंचावावी, असे निर्देश राज्य सेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिले.

पारनेर तहसील कार्यालयात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत आयोजित तालुकास्तरीय आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार गायत्री सैंदाने, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, मुख्याधिकारी प्रियांका शिंदे यांच्यासह तालुकास्तरीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

11 गुन्ह्यासह मोक्का गुन्ह्यात फरार असलेला आरोपी साथीदारसह जेरबंद

राज्य सेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी म्हणाल्या की, प्रत्येक विभागाने नागरिकांना किमान ९० टक्क्यांहून अधिक सेवा विहित कालमर्यादेत देण्याचे उद्दिष्ट साध्य करावे. ज्या विभागांची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी आहे, त्यांनी त्यामागील कारणांचा अभ्यास करून तातडीने आवश्यक सुधारणा कराव्यात. जिल्ह्याचे राज्यातील आघाडीचे स्थान कायम राखण्यासाठी प्रत्येक विभागाने अधिक जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने काम करणे आवश्यक आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, सेवा वितरणात तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक अडचणी येत असल्यास संबंधित अधिसूचनांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी संबंधित विभागामार्फत प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावेत. तसेच अधिकाऱ्यांच्या स्तरावर सेवा वितरणात होणारा विलंब टाळण्यासाठी आवश्यक प्रशासकीय उपाययोजना त्वरित राबवून नागरिकांना अधिनियमात नमूद केलेल्या निर्धारित कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून द्याव्यात.

अहिल्यानगर जिल्ह्याने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीत राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा दर्जा कायम राखण्यासाठी प्रत्येक तालुक्याने समन्वयाने आणि कार्यक्षमतेने काम करून जिल्ह्याची एकूण कामगिरी अधिक उंचावावी. प्रत्येक तालुक्याची चांगली कामगिरी जिल्ह्याची एकूण यशाची टक्केवारी वाढविण्यास हातभार लावणार आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यावर सर्व विभागांनी भर द्यावा, असे आवाहनही राज्य सेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी केले.

सुपा व कामरगाव येथील सेतू व ई-सेवा केंद्रांची पाहणी

राज्य सेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी सुपा आणि कामरगाव येथील सेतू व ई-सेवा केंद्रांना भेट देऊन तेथील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया, अर्ज नोंदणी, पोहोच देण्याची कार्यपद्धती, ऑनलाइन सेवा प्रणाली, अभिलेखांची देखभाल, तक्रार निवारण व्यवस्था तसेच नागरिकांसाठी उपलब्ध सुविधा यांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक व विहित कालमर्यादेत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रांमार्फत राबविण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीची त्यांनी सविस्तर माहिती घेतली.